Home क्राईम गँगवॉरने पुणे हादरले : भरदिवसा गोळ्या झाडून गणेश काळेची निर्घृण हत्या!

गँगवॉरने पुणे हादरले : भरदिवसा गोळ्या झाडून गणेश काळेची निर्घृण हत्या!


पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। भरदिवसाच्या उजेडात पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. कोंढव्यात आज झालेल्या गँगवॉरमध्ये गणेश काळे या तरुणाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे शहर हादरले असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोंढवा परिसरातील मुख्य रस्त्यालगत गणेश काळे याच्यावर आंदेकर टोळीतील चार जणांनी गोळीबार केला. मिळालेल्या माहितीनुसार सहा ते सात गोळ्या झाडल्यानंतर त्याच्यावर कोयत्यानेही हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या गणेश काळेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गणेश काळे हा गायकवाड टोळीतील समीर काळे याचा सख्खा भाऊ असल्याचे समोर आले आहे. समीर काळे हा सध्या वनराज आंदेकर खून प्रकरणात तुरुंगात असून, त्याच्यावर या हत्येत वापरलेल्या शस्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर बंद करून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, आसपासच्या नागरिकांच्या हालचालींवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. घटनास्थळावर लोकांच्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलीस दलाची मदत घेण्यात आली.

प्राथमिक तपासानुसार, ही हत्या वनराज आंदेकर खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदेकर टोळीने आपल्या साथीदाराच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच गणेश काळे याची हत्या केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर गायकवाड आणि आंदेकर टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरम्यान, गणेश काळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. शहरातील गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांचे आर्थिक व राजकीय संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पोलिसांच्या पुढील तपासातून या घटनेमागील खरा सूत्रधार कोण, हे स्पष्ट होणार आहे.

या घटनेने पुणेकरांमध्ये दहशत पसरली असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


Protected Content

Play sound