Home प्रशासन महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात ‘रोल मॉडेल’, सौर ऊर्जेला प्राधान्य देत देशात आघाडी

महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रात ‘रोल मॉडेल’, सौर ऊर्जेला प्राधान्य देत देशात आघाडी


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारंपरिक कोळसा आणि नैसर्गिक वायूवरील अवलंबित्व कमी करत महाराष्ट्राने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ऊर्जा परिवर्तनात राज्याने देशात अग्रस्थान मिळवले असून, भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. देशाच्या विद्युत क्षेत्रासाठी महाराष्ट्र हे ‘रोल मॉडेल’ ठरत असल्याचे गौरवोद्गार या अधिकाऱ्यांनी काढले. महाराष्ट्रातील विविध सौर ऊर्जा योजना आणि विद्युत क्षेत्रातील प्रगतीची माहिती घेण्यासाठी या अधिकाऱ्यांनी मुंबईतील महावितरण आणि महानिर्मितीच्या कार्यालयांना भेट दिली.

२०३० पर्यंत ४५ हजार मेगावॅट विजेची भर
यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महाराष्ट्राच्या भविष्यातील ऊर्जा योजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ऊर्जा विभागाने ‘रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन’ तयार केला आहे. त्यानुसार, सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे राज्यातील नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, सुमारे ७ लाख नवीन रोजगार निर्माण होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. यामुळे येत्या ५ वर्षांत वीज दरांमध्ये कपात होणार असून, कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टालाही बळ मिळेल.

‘सौर कृषी योजना २.०’ ठरतेय जागतिक विक्रम
लोकेश चंद्र यांनी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० ची माहिती दिली. या योजनेद्वारे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्पांमधून सन २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य आहे. ही योजना जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती योजना असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे राज्यात ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, ग्रामीण भागांमध्ये सुमारे ७० हजार रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्रातील ४५ लाख कृषिपंपांना या योजनेमुळे दिवसा व शाश्वत वीजपुरवठा मिळणार आहे. आतापर्यंत १९७२ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत, ज्यातून ३६९ उपकेंद्रांद्वारे शेतकऱ्यांना वीज पुरवली जात आहे.

आंतरराष्ट्रीय अधिकाऱ्यांचा गौरव
या बैठकीमध्ये न्यूयॉर्क, ताश्कंद, टांझानिया यांसारख्या विविध ठिकाणांवरून आलेल्या भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये योजना पटेल, प्रतिभा पारकर राजाराम, पारमिता त्रिपाठी, अन्कन बॅनर्जी, सी. सुगंध राजाराम, बिश्वदीप डे, आणि स्मिता पंत यांचा समावेश होता. या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या ऊर्जा धोरणाचे आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील नेतृत्वाचे कौतुक केले. यावेळी महावितरणचे सचिन तालेवार, योगेश गडकरी, महापारेषणचे सतीश चव्हाण, महानिर्मितीचे अभय हरणे यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound