Home Cities जळगाव श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे जळगावात आगमन, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी!

श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांचे जळगावात आगमन, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुकांचे आज, सोमवार १९ मे रोजी जळगावातील गणेशवाडी परिसरात मोठ्या भक्तिभावाने आगमन झाले. सकाळी ठीक साडेअकरा वाजता पादुका गणेशवाडीत दाखल होताच, स्वामी भक्तांनी जयघोषांनी परिसर दुमदुमून टाकला.

पालखीच्या आगमनापूर्वीच गणेशवाडी आणि परिसरातील रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. स्वामींच्या पादुकांचे स्वागत करण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. जसा पालखीचा रथ गणेशवाडीच्या दिशेने येत होता, तसतसे वातावरण अधिक भक्तिमय आणि उत्साही बनले होते. पादुकांचे आगमन होताच, दर्शनासाठी भाविकांनी अक्षरशः झुंबड उडवली. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी मोठ्या श्रद्धेने स्वामींच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

दुपारी बारा वाजता श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुका गणेशवाडीतील शिरसाळे परिवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. या ठिकाणी शिरसाळे कुटुंबीयांनी पादुकांची पारंपरिक पद्धतीने पूजा, अभिषेक आणि महाआरती केली. या धार्मिक विधींमध्ये शेकडो भाविकांनी अत्यंत भक्तिभावाने सहभाग घेतला. आरतीच्या वेळी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्रघोषाने संपूर्ण परिसर गुंजला.

यानंतर शिरसाळे परिवाराच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्रसादाच्या माध्यमातून स्वामींच्या भक्तांनी एकत्र येऊन स्नेह आणि एकतेचा अनुभव घेतला. श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांच्या या जळगाव भेटीमुळे शहरात एक चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिवसभर भाविकांनी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी शिरसाळे यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.


Protected Content

Play sound