मोठ्या आवाजाचे फटाके वाजविण्यावर नियंत्रण ठेवून ध्वनी व हवा प्रदुषण टाळण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार दसरा, दिवाळी व इतर सणांच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यास निर्बंध घालण्या बाबत अंतरिम आदेश दिलेले आहेत.

केंद्र शासन, केंद्र शासित प्रदेश आणि राज्य शासन यांनी भारत सरकारच्या राजपत्रानुसार प्रकाशीत केलेल्या पर्यावरण (संरक्षण) नियमातील तरतूदींचे मुख्यत्वे करुन व नियमातील सुधारित नियम ८९ ची, जे फटाकच्या आवाजाच्या मानांकाबाबत आहेत त्यांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

त्याबाबी खालीलप्रमाणे -एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मिटर अंतरापर्यंत 125 डेसीबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्याचे उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे. जर साखळी फटाक्यात एकूण पन्नास, ते शंभर ते त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागे पासून 4 मिटर अंतरापर्यंत अनुक्रमे 150,110 व 105 डेसीबल एवढी असावी व त्यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या तसेच 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाक्यांच्या उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.

फटाक्यांचे दारुकाम किंवा फटाके सायंकाळी 6 ते रात्री 10 या कालावधी व्यतिरिक्त उडविण्यास परवानगी देण्यात येऊ नये. तसेच रात्री 10 ते सकाळी 6 वाजे पर्यंत दारुकाम व फटाके यांचा वापर करण्यात येऊ नये. शांतता क्षेत्रामध्ये कोणत्याही फटाक्यांचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये. शांतता क्षेत्रामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांचे सभोवतालचे 100 मिटर पर्यंतचे क्षेत्र येते. राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यातील शिक्षण संस्थाच्या व्यवस्थापक व मुख्यध्यापक यांना ध्वनी व हवा प्रदुषणाने अपायकारक परिणाम टाळण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थांना योग्य प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. सर्वोच्च न्यायलयाने वरील आदेशाने ध्वनी / हवा प्रदुषणाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने सर्व स्थानिक वृत्तपत्रात, दुरदर्शन, आकाशवाणी व इतर प्रसिध्दी माध्यमांव्दारे प्रसिध्दी देण्यात यावी. सर्वोच न्यायालयाच्या वरील निर्देशांचे सर्व संबंधीतांना काटेकोरपणे पालन करावे वर उल्लेख केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके / साखळी फटाके जप्त करुन त्यांची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यात यावी अशा शासनाच्या सुचना आहेत. सणांच्या कालावधीमध्ये अपघात घडणार नाही याची खबरदारी घेण्याची स्थानिक प्रशासन व त्यांचे अधिकारी यांना सुचना देण्यात येत आहे. आवश्यक त्या उपाययोजनेचे नियोजन देखील त्यांनी करुन ठेवण्याची दक्षता घ्यावी असे सुचित करण्यात येत आहे. दिवाळी हा आनंदपर्व साजरा करतांना योग्य ती दक्षता जनतेने घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content