एसटी कर्मचाऱ्यांचा ३ सप्टेंबरपासून संप

मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा l मंगळवार दि. ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडण्याच्या तयारीत असून एस. टी. कर्मचारी कृती समितीने सरकारला संपाचा इशारा दिला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

राज्यभरातील एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचा-यांना राज्य शासकीय कर्मचा-यांनुसार वेतन देण्यात यावे या मागणीसाठी येत्या ३ सप्टेंबरपासून राज्यभरात एसटी कर्मचारी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा आज देण्यात आला आहे. ३ सप्टेंबरनंतर गणेशोत्सव सुरू होतो. मात्र या काळातही एसटी कर्मचा-यांनी आंदोलन पुकारले तर प्रवाशांचा मोठे हाल होऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिका-यांनी दिला आहे.

या अंदोलना विषयी बोलताना कृती समितीच्या पदाधिकारी म्हणाले की महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळ हे आशिया खंडात एक नंबरला आहे. या स्थितीत राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही कृती समिती तयार झाली आणि २०१६ पासून आमची मागणी राज्यकर्त्यांपर्यंत आम्ही वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन देण्याचा आम्हाला आश्वासन दिले. परंतु, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देत असताना त्यांनी कर्मचा-यांना देखील न्याय द्यावा. वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे पगार वाढ द्यावी, अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून ३ सप्टेंबरपासून एसटी कर्मचारी मोठे आंदोलन छेडतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Protected Content