बांग्लादेशमध्ये पुन्हा हिंसाचार; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

ढाका-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. या हिंसक घटनेत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारनेही या घटनेनंतर बांगलादेशमधील भारतीय नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच येथील भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबरदेखील जारी करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, आज ४ ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी काही नागरिकांनी अहसहकार आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानुसार हे नागरिक या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ढाक्यातील सायन्स लॅब चौकात दाखल झाले होते. मात्र, यावेळी त्यांना अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सरकारी नोकऱ्यांसाठी असलेल्या आरक्षणाची पद्धत रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केले होते. यावेळीसुद्धा बांगलादेशमधील विविध भागात हिंसासाचाराच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये जवळपास २०० जणांचा मृत्यू झाला होता. तर शेकडो नागरिक जखमी झाले होते. या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने हा आरक्षणासंदर्भातील सरकारचा निर्णय रद्द केला होता.

Protected Content