बीडमधील मनोज जरांगेच्या शांतता रॅलीत रेकार्डब्रेक गर्दी

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला बीडमध्ये मोठी गर्दी झाली असून आत्तापर्यंतची एखाद्या रॅलीसाठी झालेली ही सर्वात मोठी रेकॉर्डब्रेक गर्दी असल्याचं बोललं जात आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव मनोज जरांगे यांच्या रॅलीत सहभागी झाले असून तुफान गर्दीमुळे शहरातील सर्व रस्ते जाम झाले आहेत. आत्तापर्यंतच्या पाचही जिल्ह्यातील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारी ही गर्दी असल्याचे सांगितले जात आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व बाजूने भगवे झेंडे,बॅनर लागलेले आहेत. तसेच छोटे-मोठे मंडप घालण्यात आले असून तिथे पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. स्वयंसेवक बनून मराठा बांधव या रॅलीसाठी मदत करत आहेत. मनोज जरांगे यांनी बीडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर त्यांची रॅली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजा चौकाकडे वळाली आहे.

उपोषणकर्ते आणि शांतता रॅलीचे प्रमुख मनोज जरांगे यांनीही बीडमधील गर्दीवर भाष्य करताना बीडच्या जनतेचे आभार मानले आहेत. शांतता रॅलीला प्रत्येक जिल्ह्यात गर्दी झाली, मराठ्यांनी मराठ्यांच्या गर्दीचे रेकॉर्ड तोडले, असे जरांगे यांनी म्हटले. मनोज जरांगे यांचाही बीडमधील गर्दी पाहून उत्साह वाढल्याचे दिसून आले. मराठा समाजाचे आभार मानताना जरांगे यांनी सरकारला इशाराही दिला आहे. मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय गप्प राहणार नाही, असेही जरांगे यांनी म्हटले.

बीड जिल्ह्यातील मराठा समाजापुढे मी नतमस्तक होतो, मराठा समाजाचे मनापासून आभार मानतो, असे म्हणत बीडमधील शांतता रॅलीसाठी झालेल्या गर्दीवरुन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत. बीड शहरातील शांतता रॅलीसाठी 80 भोंगे बसवण्यात आले असून 800 स्वयंसेवक सज्ज आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी 12 रुग्णवाहिका असून त्यातील 4 कार्डियाक रुग्णवाहिका आहेत. घरासाठी 3500 पुरुष स्वयंसेवक व 1500 महिला स्वयंसेवक सज्ज असून 15 डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. बीडमधील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बीड शहरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. शहरातील विविध मार्गावरील रस्ते जाम झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.

Protected Content