आषाढी वारीनिमित्त धावणार रेल्वेच्या विशेष गाडया

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आषाढी एकादशीनिमित्त विदर्भातून पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मध्य रेल्वे नागपूर-मिरज (दोन गाड्या), नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, या ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवणार आहे.

नवी अमरावती – पंढरपूर (४ सेवा) ०१११९ विशेष गाडी नवी अमरावती येथून १३ आणि १६ जुलैला २.४० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल, तर ०११२० विशेष गाडी पंढरपूर येथून १४ आणि १७ जुलैला ७.३० ला सुटून दुसऱ्या दिवशी १२.४० वाजता नवी अमरावती येथे पोहोचेल. दोन तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ७ सामान्य डबे असतील. बडनेरा, मूर्तीजापूर, अकोला, शेगाव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डूवाडी थांबे आहेत.

खामगाव ते पंढरपूर विशेष : गाडी क्र. ०११२१ विशेष खामगाव येथून १४ आणि १७ जुलैला ११.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्र. ०११२२ पंढरपूर येथून १५ आणि १८ जुलैला ५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी ७.३० वाजता खामगावला पोहोचेल. २ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान, ७ जनरल डबे असतील. जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी येथे थांबे आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

गाडी क्र. ०११५९ विशेष गाडी भुसावळ येथून १६ जुलैला १.३० सुटून दुसऱ्या दिवशी ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. गाडी क्र.०११६० पंढरपूर येथून १७ जुलैला १०.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १ वाजता भुसावळला पोहोचेल. जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी येथे थांबा आहे. या गाडीला ५ शयनयान, ११ जनरल सेकंड क्लासचे डबे असतील, असे प्रशासनाने सांगितले.

०१२०५ नागपूर-मिरज विशेष (२ सेवा) गाडी १४ जुलैला सकाळी ८.५० वाजता नागपूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. तर ०१२०६ गाडी मिरज येथून १८ जुलैला दुपारी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. एक तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ७ सामान्य डबे असतील. ०१२०७ नागपूर- मिरज (२ सेवा) १५ जुलैला नागपूरहून सकाळी ८.५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी ८ वाजता मिरज येथे पोहोचेल. तर ०१२०८ मिरज येथून १९ जुलैला दुपारी १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. दोन तृतीय वातानुकूलित, १४ शयनयान डबे असतील. या सर्व गाड्यांना अनुक्रमे अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूर हे थांबे आहेत.

Protected Content