रत्नागिरीत होणार देशातील पहिले सागरी विद्यापीठ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दूरदूश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री सामंत यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही महिन्यापूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना आज मंजुरी दिली आहे. सागरी महाविद्यालयाला 500 ते 600 कोटी तसेच विधी महाविद्यालयाला 25 कोटी खर्च येणार आहे. त्यालाही तत्वत: मान्याता देण्यात आली आहे. समुद्रावर अभ्यास संशोधन करायचे असेल तर, रत्नागिरीत आता संधी उपलब्ध झाली आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने मानाची बाब आहे. त्यासाठी 50 एकर जागा देण्यास तयार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात कोकणदौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भातील घोषणा केली होती. कोकणच्या सर्वांगीण विकासाअंतर्गत विविध योजनांसर रत्नागिरी येथे देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली होती. भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येईल. ज्यात समुद्र विज्ञानापासून समुद्राचा इतिहास, नियम, संशोधन आदी विषयांचा अभ्यास करता येईल.

Protected Content