
अमळनेर, प्रतिनिधी | एस. टी. महामंडळाला राज्य शासनात विलीन करुन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येवून आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे व एस. टी. महामंडळाचे शासनात विलणीकरण करा अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी अमळनेर विभागातील कर्मचाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देऊन केली आहे.

निवेदनाचा आशय असा की, महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एस. टी.कर्मचारी यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. एस. टी. महामंडळातील आम्हाला मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आमच्या काही एस. टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात. परंतु, आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करु शकत नाही. वारंवार निवेदने देऊनही योग्य ‘प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहेत. हि स्वेच्छा मरणाची परवानगी आम्ही स्वतः कुठल्याही दबावात घेता करीत आहे. कारण आम्ही आता या मानसिक व सरकारकडून होणाऱ्या आर्थिक पळवणूकीला वैतागलो आहे. या मागणीकरिता आमच्यावर कुणीही दबाव टाकीत नसून स्वेच्छेने सही करीत आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एस. टी. महामंडळाला राज्य शासनात विलीन करुन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येवून आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे व आम्हा एस. टी. कर्मचाऱ्यांना जीवनदान द्यावे. अन्यथा आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर रवींद्र संदांशिव, विजय जगदाळे, श्रीकृष्ण सूर्यवंशी, समाधान कोळी, राकेश पाटील, योगेश बोरसे, दिनेश सोनवणे, मुकेश चव्हाण, योगेश चव्हाण, हेमंत सूर्यवंशी, संजय पाटील, सचिन बोरसे, किशोर पाटील, नितीन पाटील, जितेंद्र पाटील, प्रकाश चौधरी , किशोर महाजन, प्रशांत पाटील, गजानंद अवतारी, योगेश बडगुजर, राजू बाविस्कर, प्रमोद अहिरे ,विलास पाटील, समाधान लांडगे, संजय बोरसे, नितीन शिंदे, सुनील महाले आदी जवळपास ११० कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



