…अन्यथा देवाकडे प्रार्थना करण्यास सुध्दा जात नाही – इंदुरीकर

भडगाव प्रतिनिधी । माणसावर संकटे आली तरच ते देवाकडे धाव घेतात. अन्यथा देवाकडे प्रार्थना करण्यास जात सुद्धा नाही. असे ह. भ. प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी पिंपळगाव बु येथे गणेश जयंतीनिमित्त याग पूजन निमित्त जाहीर कीर्तनात म्हणाले. 

तर देवाचे पण नियम असा आहे की, देवाजवळ मागणाऱ्याला काही मिळत नाही, आणि न मागितल्यास व निस्सीम भक्ती करणाऱ्याला सर्व मिळते. म्हणून देवाने आपल्याला अनमोल असे शरीर दिले आहे. त्याचा चांगला उपयोग करा कुठलेही व्यसन न करता हसून खेळून आपले आयुष्य जगा. हा कीर्तनाचा कार्यक्रम प्रविण बळीराम पाटील पिंपळगाव, ह. मु. पुणे यांनी आयोजित केला होता. यावेळी अनेकांनी कीर्तनाचा लाभ घेतला. पुढे कीर्तनात ह.भ.प इंदुरीकर महाराज म्हणाले की, माणसाकडे भौतिक श्रीमंती असेल तर आध्यात्मिक प्रगती होईल असे नाही. परंतु आध्यात्मिक प्रगती झाली तर भौतिक प्रगती पण होतेच. 

कितीही मोठा माणूस राहिला तर त्याचे नाव जास्त काळ टिकत नाही परंतु चंद्र, सूर्य आहेत तो पर्यंत विठ्ठल, ज्ञानोबा माऊली यांचे नाव राहणार आहे. माणसे तज्ञ तर देव सर्वज्ञ आहे. म्हणून आध्यात्मिक वळण गरजेचे आहे. कोरोना बाबत इंदुरीकर महाराज म्हणाले की,अजुन कोरोंनाची भीती गेलेली नाही सहा महिने तरी आपण पथ्य पाळले पाहिजे. व इतरांना सुधा पाळायला सांगायला पाहिजे. अन्यथा या आजारावर नियंत्रण मिळणार नाही. रोग प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर नियमित व्यायाम करा. व निरोगी राहा.आपण गोर गरिबांना दान द्या. त्यांना एकवेळची भाकर मिळाली तर ते आपले पुण्य समाजा, तरुणां विषयी महाराज म्हणाले की, तरुण ही आपल्या देशाची ताकत आहे. त्यांनी कुठलेही व्यसनं करू नये. तसेच कुठल्याही क्षेत्रात तरुण मंडळी शोभते. 

तरुण हीच शक्ती आहे, तीच प्रगती सुद्धा, कुठल्याही तरुण तरुणीने पळून जाऊन लग्न करू नये. त्यांना जास्त भविष्य नाही. त्यांनी आई वडिलांचा विश्वासघात करू नये. तसेच मोबाईल चा वापर कमी करा या मोबाईल मुळे डोळ्यांचे आजार वाढत चालले आहे. दृष्टी कमी झाली आहे. मोबाईल मुळे मानसिक तणाव वाढला आहे. संवाद कमी झाले आहे. एकमेकाशी समोरासमोर बोलण्यास तयार नाहीत. यामुळे दोन वर्षात ८० टक्के लोक मनोरुग्ण झाले आहेत. या मुळे आपण मोबाईल वापर कमी करून एकमेकांशी संवाद करा, वाचन करा व तणाव मुक्त रहा. भजन, वाचन, गाथा, ज्ञानेश्वरी वाचत रहा यामुळे चैतन्य वाढते. आपल्या आयुष्यात कोणाच्याही खोट्या प्रेमात पडू नये यामुळे माणसाचे आयुष्य बरबाद होते. 

यासाठी संत संगती पाहिजे संत संगती असल्यास मानवी आयुष्य हे निरोगी राहते. माणसाने नेहेमी हसतमुख राहावे. यापुढे अजुन वाईट दिवस येतील अनेक रोग उत्पन्न होतील. जे कुणाला जमत नाही ते देवाला जमलं. यासाठी देवाचे नामस्मरण करा, हरिपाठ करा, दान करा, गावात सप्ताह करा. व आयुष निरोगी जागा असे आपल्या कीर्तनात ह. भ. प. निवृत्ती महाराज इंदुरिकर म्हणाले या वेळी पिंपळगाव पंच क्रोशितील भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला.

 

Protected Content