हतनूर धरणातून ७५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार !

जळगाव प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असल्याने धरणातील आवक वाढत असल्याने सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत धरणातून  ७५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभागातर्फे कळविण्यात आले असून तापी नदी काठावरील गावातील नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असल्याने नद्यांची पाणी पातळी सतत वाढत आहे. त्यामुळे धरणातील आवक ही वाढत आहे. धरणाची वाढती पाणी पातळी लक्षात घेता सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत धरणाचे अंदाजे 16 दरवाजे पूर्ण उघडावे लागणार असून त्यातून 75 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याचे जळगाव पाटबंधारे विभागाने कळविले आहे. 

तरी तापी नदीकाठावरील सर्व नागरिक व सर्व शासकीय यंत्रणांनी सावध राहवे. नदी काठावरील गावातील लोकांनी तापी नदी पात्रांमध्ये जावू नये, आपली गुरे-ढोरे नदीच्या पाण्यात जाणार नाहीत. तसेच नदीपात्रालगतची आपली शेती उपयोगी साहित्य, सामुग्री, पशुधन सुरक्षितस्थळी राहील याची दक्षता घ्यावी. जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून आपली काळजी घ्यावी. कुठलीही आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात आल्यास त्वरीत प्रशासनास सूचित करावे, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कळविले आहे.

Protected Content