काळजी करू नका, सगळं काही नीट होईल ; पूरग्रस्तांसाठी नाना बांधणार ५०० घरं

 

nam

 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) तुम्ही काळजी करू नका. छप्पर आले की सगळं काही नीट होईल. आपण सर्व मिळून पुनर्वसन करू, असे आश्वासन देत अभिनेते नाना पाटेकर यांनी पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. शिरोळमध्ये पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार असल्याची घोषणाही नाना यांनी यावेळी केली.

 

सांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.

 

शिरोळच्या पद्मराज विद्यालयात नाना पाटेकर यांनी भेट देत तेथील पूरग्रस्तांना धीर दिला. पूरग्रस्तांचे अश्रू पुसताना काळजी करू नका, रडायचे नाही, सगळे ठीक होईल, असे नानाने म्हटले. तसेच, केवळ मी एकटाच नाही, सगळेजण मदत करत आहेत. मी, मकरंद्या किंवा कुणीही एकटा हे मदतकार्य करत नाही. सर्वचजण मदत करत आहेत, लोकं मदत देतात. एवढी मोठी आपत्ती आलीय, तात्काळ याच निवारण शक्य होणार नाही.

 

मी सर्वांचा अतिशय आभारी आहे, येथे सर्वचजण मदत करताना मला दिसत आहेत. इथं जेवण पाहिले, किती चांगले जेवण आहे, कुणी दिलेय हे?. आपणच सर्वांनी ही मदत केलीय, असे म्हणत सर्वांच्या मदतीनेच हे पुनर्वसन शक्य असल्याचे नानाने म्हटले आहे. तसेच, सरकारही त्यांचे काम करतंय, सरकार म्हणजे कोण रे… माणसंच आहेत ना, असे म्हणत सरकारही मदतकार्यात सोबत असल्याचे नानाने सूचवले आहे. दरम्यान, यावेळी नानाला पाहून अनेकजण भावुक झाले होते, तर कित्येकांना अश्रू अनावर झाले होते.

 

शिरोळमध्ये आल्यानंतर येथील परिस्थिती कळाली. त्यामुळं ५०० घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला. आता सगळ्यांना मदतीसाठी आवाहन करणार आहे. टाकळेवाडीत तीन हजार घरांच्या प्रकल्पासाठी आढावा घेणार आहे. नाम संस्थाच नाही तर सर्वांकडून मदत घेण्यात स्वीकारली जाईल. सरकारला सुद्धा मर्यादा आहेत. त्यामुळे आपण सगळे मिळून पूरग्रस्तांचं पुनर्वसन करायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Protected Content