मुख्यमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना ४४ हजार २७८ कोटीची मदत : मुख्यमंत्री शिंदे

नागपूर-वृत्तसेवा | राज्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात अतिवृष्टी झाली होती. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतला होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून सरकारने हजारो कोटींची मदत केल्याचं  विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. भरपाईचा आकडा सांगितला त्यासोबतच सर्व हिशोब दिला आहे.

जगाचा पोशिंदा मायबाप शेतकरी मातीत सोनं पिकवतो. मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे, पिकाचं नुकसान झाल्यावर काय अवस्था होते याची मला जाणीव होते. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला होता. सत्ताधारी आणि असो किंवा विरोधक सर्वांना शेतकऱ्यांची काळजी आहे. गेल्या दीड वर्षात म्हणजे सत्तेत आल्यापासून विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला 44 हजार 278 कोटींची विक्रमी मदत केली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एनडीआरएफच्या दरात दुप्पट दराने मदत करण्याचा निर्णय घेतला. दोन हेक्टर ऐवजी मर्यादा तीन हेक्टर केली, जिरायतीसाठी 13,600, बागायतीसाठी 27,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 प्रतिहेक्टर या दराने भरपाई दिली आहे. राज्य सरकारने वाढीव दराने मदत करण्याचा निर्णय घेत 1851 कोटींचा लाभ शेतकऱ्यांना देत असल्याचं शिंदेंनी सांगितलं.

गेल्या सरकारच्या काळापेक्षा आम्ही कितीतरी पटीने मदत केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत.  शेतकरी अडचणीत असताना आम्ही घरी बसलो नाही. १ रूपयात विमा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.  दादांना शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सहन झाला नाही म्हणून ते आमच्यात आल्याचं सांगत शिंदेंनी विरोधकांना कोपरखळी मारली.

Protected Content