
पाचोरा, नंदकुमार शेलकर : गेल्या दोन वर्षांपूर्वी पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली होती. मात्र पाचोरा महसूल विभागाच्या अव्वल कारकून याने दलाल हाताशी धरुन शेतकऱ्यांचे अनुदान लाटल्याचा धक्कादायक समोर आला आहे. मात्र, याप्रकरणी आ. किशोर पाटील यांची चुप्पी का ? या रॅकेटमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी तर नाही ना ? म्हणुनच आ. किशोर पाटील यांनी चुप्पी साधली नाही ना ? असे खडे सवाल भाजपाचे नेते तथा माजी आ. दिलीप वाघ यांनी केले आहेत.
ते गुरुवारी ९ आॅक्टोबर रोजी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, भाजपा नेत्या वैशाली सुर्यवंशी, न. पा. माजी गटनेते संजय वाघ, प्रदिप पाटील, शिवदास पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सन – २०२३ – २०२४ या वर्षात पाचोरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यावेळी राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहिर केली होती. मात्र, पाचोरा महसूल विभागाचे अव्वल कारकून अमोल भोई याने संबंधित दलालांना हाताशी घेत काही नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता थेट दुसऱ्या खात्यांवर वर्ग करुन २ कोटी रुपयांचा मोठा घोटाळा घडविला. यात महाविद्यालयीन विद्यार्थी नाहक अडकविण्यात आले आहे. हा घोटाळा केवळ २ कोटी रुपयांचा नसून मागील काळात देखील अशा स्वरुपाचा घोटाळा झाला आहे. सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचेही मा. आ. वाघ यांनी यावेळी स्पष्ट केला.
एकीकडे सत्तेत असलेले आ. किशोर पाटील हे ते शेतकऱ्यांना अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचा दावा करतात. मग एवढ्या मोठ्या घोटाळ्यात आ. किशोर पाटील यांची चुप्पी का ? या घोटाळ्यात शिवसेनेचे पदाधिकारी तर सहभागी नाही ना ? म्हणुनच आ. किशोर पाटील यांची चुप्पी नाही ना ? असे प्रश्न उपस्थित केले. मा. आ.वाघ यांनी ऐन स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर उपस्थित करुन ऐकला चलो रेचा नारा दिला आहे. या घोटाळ्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल झाले असले तरी या प्रकरणाची चौकशी एस. आय. टी. अथवा अन्य चौकशी यंत्रणेमार्फत व्हावी अशी मागणी देखील मा. आ. दिलीप वाघ यांनी या पत्रकार परिषदेत केली.



