अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणारी झामी चौकातील २६ अतिक्रमणे आज (२२ एप्रिल) नगरपालिकेने हटवली. या कारवाईत १० पक्की घरे आणि १६ दुकानांचा समावेश होता. नगरपालिकेने अतिक्रमणांवर कठोर भूमिका घेत ही कारवाई केली, ज्यामुळे सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या आदेशानुसार बांधकाम विभागाचे अभियंता डिगंबर वाघ, अभियंता सुनील पाटील, शिमाली आंबोरे, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल आणि त्यांच्या पथकाने दोन जेसीबी मशीनच्या मदतीने सकाळी १० वाजता अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. अमळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
गांधीनगर पाठोपाठ झामी चौकातील रस्त्यांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे.
दरम्यान, मुख्य बाजारपेठेतील १२३ भूखंडांवरील अतिक्रमणांबाबत नागरिकांनी सवाल उपस्थित केले आहेत. यापूर्वी जेव्हा अतिक्रमण काढण्यात आले होते, तेव्हा काही दुकानदारांना रस्त्यावर अतिक्रमण असूनही थोडी जागा सोडून सवलत देण्यात आली होती. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांची अतिक्रमणे तातडीने हटवण्यात आली, मात्र धनदांडग्यांची अतिक्रमणे का हटवली नाहीत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. ठराविक लोकांनाच सहकार्य का केले जाते, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. भाजी बाजारात जाताना पायी चालणेही कठीण झाले असून, महिला आणि तरुणींना धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो. त्यामुळे १२३ मधील उर्वरित अतिक्रमण त्वरित हटवून महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.