जळगाव प्रतिनिधी | तापी नदीच्या वरील भागात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे चौदा दरवाजे आज सकाळपासून उघडण्यात आले आहेत.
याबाबत वृत्त असे की, हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे १४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यानुसार आज दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ७.०० वाजता धरणातून तापी नदीपात्रात ४०८९४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.दरम्यान, धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.