४२ कोटींची कामे लवकरच मार्गी लागणार ; महापौरांची कार्यकारी बांधकाम अभियंत्यांशी चर्चा

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विकास कामांकरीता विविध योजने अंतर्गत शासनाने वितरीत केलेल्या निधीतून करण्यात येणार्‍या कामांना शासनाने लावलेली स्थगिती काल उठविल्यानंतर शहरी नगरोत्थान योजनेंतर्गत 100 कोटींपैकी 42 कोटींच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राबविलेल्या निविदा प्रक्रियेतील कामे पुन्हा सुरू होण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांच्यासह नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली. ४२ कोटीतील कामांसाठी निविदा उघडण्यात आल्या असून पुढील प्रक्रिया राबविण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची महिती त्यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या दालनात उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, ऍड.शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नितीन बरडे, विशाल त्रिपाठी, अतुलसिंग हाडा, ऍड.दिलीप पोकळे, सुनील खडके, प्रशांत नाईक, डॉ.चंद्रशेखर पाटील, गजानन देशमुख, किशोर चौधरी, शहर अभियंता सुनील भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ.विरेन खडके, किरण बेंडाळे आदी उपस्थित होते.

जळगाव शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या 100 कोटींच्या निधीची स्थगिती शासनाने उठविल्यामुळे शहरातील 42 कोटींची विकासकामे आता होणार आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांची बुधवार दि.21 रोजी भेट घेणार असल्याचे महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले.

महापौर भारती सोनवणे यांनी शहराच्या विकासाठी शासनाने दिलेल्या निधीतील ४२ कोटींची कामे लवकरात सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांना सांगितले. कार्यकारी अभियंता म्हणाले की, शासनाने नगरोथान योजनेंतर्गत मंजूर १०० कोटींच्या निधीपैकी ४२ कोटीतील कामांच्या निविदा उघडण्यात आल्या होत्या, परंतु त्यानंतर शासनाचे आदेश आल्याने त्यास स्थगिती मिळाली. आता स्थगिती दूर झाली असल्याने आणि कामे पंधरा कोटींपेक्षा अधिकची असल्याने त्याबाबतचा प्रस्ताव नाशिक विभागीय कार्यालयात पाठवून त्यास मंत्रायलातून मंजुरी घ्यावी लागेल. त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.

शासनाचे आभार, ५८ कोटींच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी : महापौर
जळगाव शहरासाठी मंजूर ४२ कोटींच्या कामांची स्थगिती उठविल्याबद्दल महापौर भारती सोनवणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून शासनाचे आभार मानले आहे. तसेच उर्वरीत ५८ कोटींच्या कामांचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्यात आला असून त्याला देखील लवकरात लवकर मान्यता द्यावी अशी विनंती महापौर यांनी केली आहे.

Protected Content