२ बहिणींचे अपहरण करून सामूहिक अत्याचार

जालोर: वृत्तसंस्था । हाथरस घटनेनंतर अवघा देश हादरला असतानाच, राजस्थानमध्ये जालोर जिल्ह्यातील जसवंतपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजपुरामध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.

या घटनेनंतर खळबळ माजली असून, पोलिसांनी रात्री उशिरा एका आरोपीला अटक केली आहे. चेतनराम भील असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

खाण्डालदेवल गावातून शनिवारी रात्री काही तरुणांनी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. पाच जण आरोपी होते, अशी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी या मुलींना बेशुद्धावस्थेत राजपुराच्या टेकडीवर फेकून पसार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अवधेश सांदू आणि चंद्रप्रकाश जाब्ता यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. मुली बेशुद्धावस्थेत पडल्या होत्या. त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सांचौरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक दशरथसिंह यांच्या आदेशानुसार जसवंतपुरा, रामसीन, बागोडा आणि भीनमाल पोलीस ठाण्याच्या प्रभारींच्या नेतृत्वाखाली चार पथके स्थापन केली आहेत. ही पथके आरोपींचा शोध घेत आहेत. पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खाण्डादेवल येथील रहिवासी चेतनराम याच्यासह पाच जणांनी शनिवारी रात्री उशिरा घरात घुसून अल्पवयीन मुलींचे अपहरण केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितांच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एका पीडितेने शुद्धीवर आल्यानंतर जबाब नोंदवला असून, सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगितले.
घरातून अपहरण केल्यानंतर मुलींच्या शोधासाठी पोलीस राजपुरा येथे पोहोचले. राजपुराजवळील टेकडीवर या मुली बेशुद्धावस्थेत आणि जखमी अवस्थेत आढळून आल्या. एका मुलीच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू होता. अल्पवयीन मुलींना आरोपींनी मारहाण केली. जखमी झाल्याने आणि घाबरल्याने मुली बेशुद्ध झाल्या, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Protected Content