हवाल्याचे १५ लाख रूपये घेऊन जाणार्‍यांवर चाकू हल्ला : एक ठार

जळगाव प्रतिनिधी | जळगावहून एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे हवाल्याचे १५ लाख रूपये घेऊन जाणार्‍यांची कार अडवत एका टोळक्याने यातील दोघांवर चाकूने हल्ला केला असून यात एक जण ठार तर एक जखमी झाला आहे. ही धक्कादायक घटना रात्री घडली.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, स्वप्निल रत्नाकर शिंपी (वय २९, रा. फरकांडे, ता. एरंडोल) यांचे कासोदा येथे धनदाई ट्रेडर्स या नावाचे शेतमाल खरेदीचे दुकान आहे. स्वप्निल हे शुक्रवारी दुपारी कासोदा येथून जळगाव येथे आलेले होते. सायंकाळी जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेतल्यानंतर कारने (एम.एच. ०१ ए.एल. ७१२७) त्यांच्याकडे कामाला असणार्‍या दिलीप राजेंद्र चौधरी (रा. फरकांडे) यांच्यासोबत गावी फरकांडे येथे निघाले होते. रात्री आठच्या सुमारास पाळधी येथील साईबाबा मंदिराच्याजवळ असलेल्या पेट्रोलपंपालगत तुमच्या कारने एका दुचाकीस्वाराला उडवले असल्याचा बहाणा करून त्यांच्या कारच्या पाठीमागून तीन दुचाकींवर चार जण आले. त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावली.

यानंतर त्यांनी कारची चावी काढून स्वप्निल यांना बाहेर ओढले. तर दुसर्‍याने दिलीप चौधरी यांच्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, स्वप्निल शिंपी यांच्याकडून बॅग हिसकावण्यासाठी हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. मात्र त्यांनी बॅग न सोडता ते जखमी अवस्थेत रस्त्याने पळत सुटले. या आरडाओरडमुळे हल्लेखोर बॅग सोडून पळून गेले. ही माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दोन्ही जखमींना रूग्णालयात नेले. मात्र स्वप्नील शिंपी यांना मृत घोषीत करण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Protected Content