फैजपूर, प्रतिनिधी | जल, वायु व ध्वनी प्रदूषणाबरोबरच आज संस्काराचे प्रदूषण वाढले आहे. ज्ञानी माणूस आपल्या ध्यानाचा पुरेसा वापर न करता निर्बुद्धपणे वागत आहेत. हे प्रदूषण घालवण्यासाठी माणसाने हरीनाम घ्यावे, असे परमपूज्य हभप भरत महाराज पाटील बेळीकर यांनी उपस्थित हजारो भाविकांना प्रथम दिवसाच्या निरुपणात संगितले.
फैजपूर येथे श्री खंडोबा देवस्थानाच्या प्रांगणात २७ कुंडी महाविष्णू याग महोत्सव गाथा पारायण व नाम संकीर्तन सप्ताह सुरू असून या सप्ताहाचा आज पहिल्या दिवसाची सेवा हभप भरत महाराज पाटील यांच्या किर्तनाने झाली. या कार्यक्रमास अमळनेरचे परमपूज्य प्रसाद महाराज तसेच वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ परमपूज्य हभप लक्ष्मण बाबा महाराज कोल्हे, हभप माधव महाराज राठी, हभप दुर्गादास महाराज, हभप सुखदेव उर्फ कन्हैया महाराज यांच्यासह वैकुंठवासी नथू सिंग बाबा दौरा मंडळ व सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील गुणीजन गायक-वादक यांची उपस्थिती होती.
भगवंत नामाने मनुष्याचे जीवन सर्व संपन्न होते, त्यासाठी वेदाचा पुरावा महत्त्वाचा असून वेद, श्रुती, पुराणे यांचा पुरावा हाच भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. मनुष्याला सुखाची प्राप्ती होण्यासाठी सोदाहरण त्यांनी समजावून सांगितले. संत तुकाराम महाराज म्हणतात एकच हरीचे नाम घेतले तर सर्व प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते. रोग, दुःख जरी वेगवेगळे असले तरी हरीचे नाम घेतले तर सुख मिळते याचा अनुभव आपण सर्वांनी पंढरपुर दिंडी सोहळ्यात घेतच असतो.
दिनांक २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमास पंचक्रोशीतील शेकडो भाविकांची उपस्थिती लाभत आहे. दिनांक २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी २० यादरम्यान दुपारी तीन ते पाच ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांचे योगी पावन मनाचा मुक्ताई चिंतन तसेच ताटीचे अभंग यावर प्रवचन होईल. त्याचप्रमाणे आज पासून एक फेब्रुवारी पर्यंत दररोज सकाळी ८.०० ते १.०० एक यादरम्यान २७ कुंडी महाविष्णू याग यज्ञ होईल तसेच दररोज सकाळी ८ ते १२ या दरम्यान गाथा पारायण असे विविध महत्वपूर्ण कार्यक्रम होणार असून सकाळी ५ ते ६ काकडा आरती, ६ ते ७ विष्णुसहस्रनाम व संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ असा कार्यक्रमांचा खजिना भक्तांसाठी उपलब्ध आहे. आज संध्याकाळी ८-०० वाजता प्रसिद्ध किर्तनकार श्री हभप माधव महाराज राठी, नासिक यांचे कीर्तन होणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.