सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक हिंगोणेकर; समारोपीय अध्यक्ष चौधरी

जळगाव प्रतिनिधी । एक दिवसीय राज्यस्तरीय सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन खानदेशातील नामवंत कवी शशिकांत हिंगोणेकर (जळगाव) यांच्याहस्ते करण्यात येणार आहे तर खानदेशातील नामवंत कवी, समीक्षक, व्यंगचित्रकार प्रा.बी.एन.चौधरी (धरणगाव) हे संमेलनाचे समारोपीय सत्राचे अध्यक्षपद भूषवणार आहेत

शहरातील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमीत्त श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय सतरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन जळगावी येत्या डिसेंबर मध्ये खानदेशातील सुप्रसिद्ध लेखक, कवी अशोक कोतवाल (जळगाव) यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविलेले आहे.

या पूर्वी सर्व प्रा.जवाहर मुथा , अरूण नारखेडे , विद्याधर पानट , प्रा.डाॅ. सुनील मायी सुशील पगारिया, प्रा डाॅ म. सु. पगारे, वि .भा. नेमाडे, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, अशोक कोतवाल , भगवान भटकर, सौ.माया दिलीप धुप्पड ,सुभाषचंद्र वैष्णव, प्रा .विश्र्वास वसेकर ,डाॅ. विजया वाड, डाॅ नरसिंह परदेशी, रवींद्र पांढरे या मान्यवरांनी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन केलेले आहे तर सर्वश्री विद्याधर पानट, प्रा प्रसन्नकुमार पाटील, डाॅ मु.ब.शहा, अशोक नीलकंठ सोनवणे, प्रा वि.शं.चौघुले, सौ.अपूर्वा सोनार, सिसिलिया कार्व्हालो, डाॅ उल्हास कडूसकर,पद्मश्री यू.म.पठाण, प्रा.भास्कर गिरिधारी, प्रभा गणोरकर, एकनाथ आव्हाड,डाॅ संजीवकुमार सोनवणे,भारत सासणे,प्रा डाॅ संजीव गिरासे, डाॅ छाया महाजन या मान्यवरांनी समारोपीय सत्राचे अध्यक्षपद भूषविलेले आहे.

कविता पाठवण्याचे आवाहन

संमेलनात शब्द झंकार सत्राअंतर्गत कविसंमेलन होणार असून संमेलनात कविता वाचन करू ईच्छित कवींनी आपल्या दोन कविता पाठवाव्यात. त्यातून एक कविता कविसंमेलनासाठी निवडण्यात येईल. सहभाग सर्वांसाठी खुला असून कुठल्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही. कवितेसाठी विषयाचे बंधन नाही. तरी कवींनी आपल्या दोन कविता २० ऑगस्ट २०२० पर्यंत डी. बी. महाजन , सचिव सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ , प्लाट नं ८९/१, गिताई ,गोविंदपुरा, संभाजी नगर जळगाव ४२५००२ या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, उपाध्यक्ष प्रवीण लोहार, सल्लागार साहेबराव पाटील यांच्यासह खानदेशातील जिल्हा व तालुकाध्यक्षांनी केलेले आहे.

Protected Content