संघ बळजबरी पुरुषांची नसबंदी करू इच्छित असेल तर मोदींनी तसा कायदाच आणावा : राष्ट्रवादी

4Nawab Malik 14

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते. यावर कायदा असल्यानंतरही संघ बळजबरी पुरुषांची नसबंदी करू इच्छित असेल तर मोदींनी तसा कायदाच आणावा, असे आव्हान राष्ट्रवादीने दिले आहे.

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत म्हटले होते की, सध्या देशातली लोकसंख्या वाढ हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी दोन मुलंच जन्माला घालण्याचा कायदा आणायला हवा. अशा प्रकारच्या कायदा आणल्यास लोकसंख्या नियंत्रणात येईल. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता देशात दोन मुलं जन्माला घालण्याच्या कायद्यासाठी आग्रही असेल. देशात यासंबंधी जनजागृती मोहीम राबवेल असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. मलिक म्हटले की, मोहन भागवत दोन मुलांचा कायदा आणू इच्छित आहेत. त्यांना कदाचित माहिती नसेल की महाराष्ट्रात आधीपासूनच हा कायदा आहे. इतर राज्यांमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कायदे लागू आहेत. तरीही मोहन भागवत बळजबरी पुरुषांची नसबंदी करू इच्छित असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तसा कायदाच बनवावा, असे मलिक यांनी म्हटले आहे.

Protected Content