शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणची धडक मोहीम

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राज्यातील वीज ग्राहकांचा विशेषतः शेतीसाठीचा वीजपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने नादुरुस्त रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बदलण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार महावितरणने केवळ ७ दिवसात ७,८६७ नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलली आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने स्वतः सर्व संबंधित अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच महावितरणचे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी दिवसरात्र पाठपुरावा करून कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टीमवर्कच्या आधारे राज्यातील ७८६७ नादुरुस्त रोहित्रे बदलण्याचे काम पूर्ण केले.

एका विशेष कृती आराखड्याच्या अंतर्गत नादुरुस्त वितरण रोहित्रे बदलण्याची मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी महावितरण मुख्य कार्यालयातर्फे क्षेत्रीय कार्यालयांना मुबलक प्रमाणात ऑइल उपलब्ध करून देण्यात आले. रोहित्र दुरुस्त करणाऱ्या एजन्सींनाही तातडीने रोहित्रे दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यात नादुरुस्त असलेल्या एकूण ६०९८ वितरण रोहित्रांपैकी ७ डिसेंबर २०२२ पर्यंत ५९१७ वितरण रोहित्रे बदलण्यात आली आहेत. याशिवाय २९ नोव्हेंबर २०२२ नंतर नादुरुस्त झालेल्या रोहित्रांपैकी १९५० रोहित्रेही महावितरणतर्फे बदलण्यात आलेली आहेत.

इतक्या कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त रोहित्रे बदलण्याची ही पहिलीच वेळ असून रोहीत्र नादुरुस्त होताच ते लवकरात लवकर बदलण्यासाठी महावितरण विशेष नियोजन करत आहे. नादुरुस्त वितरण रोहीत्रे बदलण्यासाठी रोहित्रांची मुबलक उपलब्धता असावी यासाठी नादुरुस्त असलेले रोहित्रे त्वरीत दुरुस्त करण्याच्या सूचनादेखील विजय सिंघल यांनी दिल्या आहेत.

Protected Content