शिवसेना सर्वांची वाट लावते- ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । कित्येक लाटा आल्या आणि गेल्या पण शिवसेना सर्वांची वाट लावते या शब्दांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते स्थानिक लोकाधिकार समितीच्या कार्यक्रमात बोलत होते.

लातूरमध्ये भाजपच्या मेळाव्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मित्रपक्ष आमच्या सोबत आला तर ठीक, नाहीतर विरोधकांसह त्यांना पटक देंगे अशी धमकी दिली होती. शहा यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. काही जण काम न करता टिमकी वाजवत आहेत. फक्त २०१९ नाही तर, पुढची सगळी वर्षं आपली असणार आहेत असं म्हणताहेत. मात्र, माझ्या देशाचे काय होणार याचं कोणालाच काही पडलेलं नाही असा टोला त्यांनी मारला. सरकार मजबूत नसलं तरी चालेल पण, देश मजबूत असला पाहिजे. आपल्याच छाताडावर बसणारं सरकार असेल तर मग ते चुलीत फेकून द्यायचे नाही तर काय करायचे? अशा शब्दात उद्धव यांनी भाजपवर हल्ला चढविला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तुमच्या खात्यात १५ लाख येतील हा म्हणे जुमला होता. मग, राम मंदिराचा मुद्दा ही जुमलाच समजायचा का? राम मंदिराचा मुद्दाही जर तुम्हाला जुमला वाटत असेल, तर लोकांनी तुमच्यावर का म्हणून विश्‍वास ठेवायचा? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

Add Comment

Protected Content