शाह – पवार भेटीची बातमी म्हणजे विरोधकांनी टाकलेला खडा — बाळासाहेब थोरात

 

मुंबई : वृत्तसंस्था । “विरोधी पक्ष काही खडे टाकण्यात यशस्वी होतो आणि मीडियाकडून तो विषय उचलला जातो. वस्तुस्थिती वेगळी असते आणि मीडियामध्ये वेगळं सुरु असतं,”  अशी प्रतिक्रिया अमित शाह आणि शरद पवार यांच्या कथित भेटीबद्दल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अहमदाबादमधील भेटीचं वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून फेटाळण्यात आलं आहे. मात्र भाजपा नेत्यांच्या वक्तव्यामुळे या भेटीची चर्चा कायम आहे. राज्यात कोणतीही नवी समीकरणं अस्तित्वात येणार नाहीत असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.

 

या घडामोडींवर  काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की, “अशा बातम्यांना आम्ही फार महत्व देत नाही. राष्ट्रवादीने देखील यासंबंधी स्पष्ट खुलासा केला आहे. रात्रीच मी पवारांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बोललो. त्यांनीदेखील मुद्दाम  हा विषय काढला आणि कसे लोक भेद, गैरसमज निर्माण करत असल्याचं सांगितलं. त्यांना भेटायचं असतं तर दिल्लीत सर्वांची घरं आहेत तिथेही भेटू शकतात. त्यामुळे अशा प्रकारचं वेगळं काही असेल असं मला वाटत नाही”.

 

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या पवारांनी युपीएचं नेतृत्व करण्यासंबंधीच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “युपीएचं नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. अवघड दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसेच दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणं मला योग्य वाटत नाही”.

 

“संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचं आम्ही जाहीरपणे सांगत असतो. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असं वाटून जातं. तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचं काम आहे. असं वक्तव्य करुन मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करु नये,” असं स्पष्ट मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

 

“अशा वक्तव्यामुळे नाराजी होत असते. जेव्हा आघाडीचे प्रमुख एकत्र येतो तेव्हा यावर साहजिकच चर्चा होते. आघाडीचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे, आम्ही घटकपक्ष आहोत. सर्वांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. सोनिया गांधी आणि शरद पवारांमध्ये चांगले संबंध असून असं वक्तव्य करुन भेद निर्माण करण्याची काही गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

Protected Content