शहरात कामाशिवाय कोणीही बाहेर फिरू नये – प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले

फैजपूर प्रतिनिधी । कोरोना विषयी जागरूक राहून लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्याने यावल व रावेर तालुक्यात एकही रूग्ण बाधित आढळून आला नाही. तरूणांनी आपल्या शहरात काहीही कारण नसतांना फिरू नये असे आवाहन फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

यावल व रावेर तालुक्यातील आत्तापर्यंत एकही रूग्ण आढळून आला नाही. मात्र भविष्यात संभव्य रूग्ण वाढू शकतात. सर्वांनी जागरूक राहून लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे. सर्वांनी धैर्याने प्रशासनाला साथ दिल्यामुळेच आपण पुढे मार्गक्रमण करीत आहोत. लॉकडाऊन हे मुख्यतः आपल्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी आहे याचा मुख्य उद्देश हा कोरोनची साखळी तोडणे हा आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंचे पालन करणे, सतत हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. मागील एक महिन्यापासून आपण त्याचे तंतोतंत पालन करत आहोत. या कालावधीमध्ये आपण मास्क न वापरणारे आणि आणि विनाकारण गाडीवर फिरणारे यांच्याकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केलेला आहे.

भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी आपण कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून फैजपुर उपविभागात 1000 रुग्णांसाठी आवश्यक सुविधांसह सेंटर उभे केले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांकरिता विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या कक्षांमध्ये आतापर्यंत 500 पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. सर्व डॉक्टर, पोलीस, शिक्षक, आरोग्य सेविका, अशावर्कर, प्रशासकीययंत्रणा चांगल्याप्रकारे काम करत आहेतच. विशेष उल्लेख करावा असे म्हणजे सर्व गावातील ग्रामस्तरीय समित्या आणि सर्व वैद्यकीय केंद्रात सेवा देणारे डॉक्टर आणि सहयोगी यंत्रणा कोरोणापासून आपला बचाव व्हावा. यासाठी 24×7 प्रयत्न करत आहेत. पाच ठिकाणे निश्चित करून त्याठिकाणी नाकाबंदीही केली आहे.

शासनाने आता बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या कामगार, नागरिक यांना स्वतःच्या गावांमध्ये येण्यासाठी सशर्त नोडल अधिकारी यांची परवानगी घेऊन प्रवेश देण्याचे निश्चित केलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या गावात येऊ शकतात. जे नागरिक येतील त्यांना आपल्याला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवायचा आहे. त्यासाठी आपण २४ एप्रिलला परिपत्रक काढलेले आहे. त्यानुसार आपल्या घरांमध्ये किंवा आपल्या भागांमध्ये किंवा आपल्या गावांमध्ये किंवा आपल्या शहरांमध्ये या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आपल्याला बाहेरून आलेल्या व्यक्तीला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे लागणार आहे. याचे तंतोतंत पालन व्हायला हवे, त्याचे पालन न करणाऱ्यावर आपण गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. जर एखादी व्यक्ती बाहेर व्यवस्थित राहत असेल तर त्याला आपल्याकडे विनाकारण आणण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या नजिकच्या भुसावळ, अमळनेर, जळगाव ,पाचोरा, चोपडा या तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. तरूणांनी शहरात विनाकारण बाहेर फिरू नये, आपली स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला घाबरू नका, पण जागरूक रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा. असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी आवाहन केले.

Protected Content