व्यसन व्यक्तीचा विवेक करतो नष्ट : उत्तम कांबळे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देशाचा अमृत महोत्सव साजरा करताना आपण आजही स्वराज्यकडे गेलोच नाही. व्यसन व्यक्तीचा विवेक नष्ट करतो. आपण दृश्यावर खेळतो. कारण आपण सामान्य माणूस आहोत. समोर दिसते ते पूर्ण सत्य नसते. दृश्य म्हणजे मूळ नव्हे, त्याला खतपाणी कुठून मिळते ते समजून घ्यायला पाहिजे. आजही जुन्या सवयीचे आपण गुलाम आहोत, कोणालाही मालक म्हणण्याची आज सवय सोडली पाहिजे, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यीक, माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रतर्फे शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता राष्ट्रीय महामार्ग ६ वरील केंद्राच्या कार्यालयात “शिव चेतना सन्मान सोहळा २०२३” चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील २६ व्यक्तींना “शिव चेतना सन्मान” पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक तथा विचारवंत उत्तम कांबळे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जम्मू आणि काश्मीर येथील भाजपचे राष्ट्रीय प्रभारी तथा मुंबई येथील रक्षंदाताई सोनवणे, मुंबई येथील मनसे नेते, माजी आ. जयप्रकाश बाविस्कर, हास्यजत्रा फेम हेमंत पाटील, लेखक मनोज गोविंदवार, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन केले. यानंतर विनोद ढगे व सहकाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. प्रस्तावनेतून केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी कार्यक्रमाविषयी माहिती देऊन महाराष्ट्र व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.

रक्षंदाताई सोनवणे यांनी, व्यसनमुक्ती कार्याचा गौरव करून सन्मानार्थीच्या कार्याला सदिच्छा दिल्या. भाजप युवा वर्ग व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार, दिल्ली येथेही कार्यक्रम घेणार असल्याचे सांगितले.

साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले की, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर बुद्ध कधीच हसला नाही. फक्त स्मित करतो. व्यसनामुळे जे निराश झालेले आहेत, त्यांना पुन्हा चेतविण्याचे काम ही चेतना व्यसनमुक्ती केंद्र करीत आहे. म.गांधींनी स्वातंत्र्य म्हणजे शेवट नव्हे तर आपल्याला स्वराज्यकडे जायचे आहे. व्यवस्था बदलाची लढाई प्रत्येक नागरिकांनी केली पाहिजे, असेही उत्तम कांबळे म्हणाले.

माजी आ. जयप्रकाश बाविस्कर, मनोज गोविंदवार, हेमंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मोहिनी सोनार यांनी तर आभार चेतना विसपुते यांनी मानले.

सन्मानार्थी
अमरावती येथील स्वाती सावजी, गडचिरोली येथील संदीप कटकूरवार, आर्या फाउंडेशनचे डॉ.धर्मेंद्र पाटील, गोळवलकर रक्तपेढीचे संध्या किशोर पाटील, चाळीसगाव येथील प्रमोद चव्हाण, उन्मेष पाटील, डॉ.आदित्य जहागीरदार, ऍड.सीमा पाटील, नागपूर येथील धनंजय मांडवकर, परमेश्वरी ग्रुप, जळगावचे डॉ.विद्या चौधरी, जळगाव पोलिस दलाचे अमित माळी, नागपूर येथील कपिल साखलवार, प्रशांत तायडे, सागर कैलास सोनवणे, खेळाडू शिवम प्रवीण पाटील, विद्यापीठाचे डॉ.सोमनाथ वडनेरे, प्रा. निलेश चौधरी, रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, पत्रकार चंद्रशेखर नेवे, तेजस पाटील, संजय विसपुते, प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे, महाराष्ट्र अंनिसचे अमळनेर येथील सुनील वाघमोडे, मनीष चव्हाण, प्रा.संजय भामरे अशा २६ सन्मानार्थीना ‘शिव चेतना सन्मान २०२३’ करून मान्यवरांनी गौरविले.

Protected Content