वैज्ञानिक , संशोधकांमुळेच देश कोरोनासंघर्षात आत्मनिर्भर — मोदी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशातल्या वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे वर्षभरात कोरोना प्रतिबंधक लस तयार करुन देश आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

 

विज्ञान व उद्योग संशोधन परिषदेच्या  आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात दिलेल्या योगदानाविषयी त्यांचं कौतुक केलं.

 

भारतानं वर्षभरातच लस तयार करून जगाला दिली. हे वैज्ञानिकांच्या परिश्रमाचं फळ असल्याचंही मोदी म्हणाले.  आता समाजाशी संवाद साधून, त्यांच्या सल्ल्यांचा विचार करुन काम करायला सुरुवात केली आहे. या परिषदेबद्दल लोकांना माहिती मिळायला हवी. आपल्या देशातले वैज्ञानिक, संशोधक कशासंदर्भातलं काम करत आहेत, हे त्यांना सोप्या भाषेमध्ये कळायला हवं. त्यामुळे तशी माहिती उपलब्ध करुन देण्याचा सल्ला मी देत आहे.

 

देश आता सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे जात आहे. आता योग्य नियोजन करुन आणि निश्चित दिशेने देशाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत सध्या  प्रगतीचा वेग मंदावला असला तरीही आत्मनिर्भर भारत हाच संकल्प आहे. वैज्ञानिकांची

कोरोनाकाळातली परिश्रम करुन आत्मनिर्भर होण्याची भूमिका ज्याप्रमाणे आहे, तशीच भूमिका आपल्याला प्रत्येक क्षेत्रात घ्यायची आहे, असंही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी सर्व वैज्ञानिक आणि संशोधकांचे आभारही मानले.

 

त्यांनी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थी हितासाठीच घेतला असल्याचंही सांगितलं. दुसरी लाट ओसरत असली तरी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत केंद्र सरकारने ‘सीबीएसई’च्या दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परीक्षेच्या दडपणातून मुक्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी गुरुवारी शिक्षण मंत्रालयाने दूरसंचार माध्यमाद्वारे चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत अचानक मोदींनी सहभागी होऊन सर्वांना अचंबित केले. तमाम विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी परीक्षा रद्द केल्याबद्दल मोदींचे आभार मानले

 

Protected Content