नवी दिल्ली : वृत्तसंस्था| “विरोधी पक्ष मजबूत असता तर शेतकऱ्यांना आंदोलनाची काय गरज होती?” असं भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास महिनाभरापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र अद्यापही तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
दरम्यान, नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्याच्या शेतकरी संघटनांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना बुधवारी (३० डिसेंबर) दुपारी २ वाजता बैठकीला बोलावले आहे. मात्र, पंतप्रधानांवर दबावतंत्राचा परिणाम होणार नाही, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या भूमिकेवर शेतकरी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे दिसत आहे.
शेतकरी आंदोलनाबाबत विविध वक्तव्यं समोर येत आहेत. शेतकरी आंदोलनास काही राजकीय पक्षांची फूस आहे, या आंदोलनाच्या आड विरोधी पक्ष राजकारण करत आहेत, हे आंदोलन विरोधी पक्षांच्या ताब्यात गेलं आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी वरील विधान केलं आहे.
राकेश टिकैत यांना विचारण्यात आले की, जेव्हा पंतप्रधान मोदींसह त्यांचे अनेक मंत्री एमएसपी आणि बाजार समिती बाबत विश्वास देत आहेत, तरी देखील तुम्ही आंदोलन का करत आहात? तेव्हा टिकैत म्हणाले की, जर तुम्ही जुन्या घडामोडी पाहिल्या तर विश्वास ठेवण्याचे कुठलेच कारण दिसत नाही. जर सरकार कायद्यात बदल करण्यास तयार आहे. तर मग कायदे मागे घेण्यात काय अडचण आहे? हाच मुद्दा आहे की सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवता येत नाही.