जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षणशास्त्र प्रशाळेत ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि सादरीकरण स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आलेले होते.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण दिले जाणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेसह संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी बोधात्मक भावात्मक आणि क्रियात्मक स्तरावर प्रयत्न करणे हे महत्त्वाचे असल्यामुळे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये प्रयोगशीलता आणि नावीन्यता निर्माण करून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज लक्षात घेता शिक्षणशास्त्र प्रशाळेद्वारे शिक्षकांमधील प्रयोगशीलता, सृजनशीलता व नवनिर्माण क्षमता निर्माण होण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत प्रथम पारितोषिक हे संचिता जाधव शिक्षणशास्त्र प्रशाळा आणि टीना राठोड अध्यापिका विद्यालय जळगाव यांना विभागून देण्यात आले. द्वितीय पारितोषिक मोनिका सोळंके आणि स्वप्निल पाटील शिक्षणशास्त्र प्रशाळा यांना विभागून देण्यात आले तर तृतीय पारितोषिक स्नेहा सोनार शिक्षणशास्त्र प्रशाळा आणि विजय बाविस्कर ओम साई शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिरसोली यांना विभागून देण्यात आले.
प्रस्तुत स्पर्धेत परीक्षेत म्हणून श्रीमती शैलजा माहेश्वरी आणि डॉ. मनीषा जगताप यांनी काम पाहिले तसेच अशा स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात यावे असे मत परीक्षक आणि सहभागी विद्यार्थ्यांनी या वेळी व्यक्त केले. सदर स्पर्धेची संकल्पना ही शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा यांची होती. सदर स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून डॉ. स्वाती तायडे यांनी काम पाहिले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. संतोष खिराडे, डॉ. रणजीत पारखे आणि जयश्री पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी जयेश पाटील, विष्णू कोळी व विभागातील सर्व विद्यार्थांचे यांचे सहकार्य लाभले.