

जळगाव प्रतिनिधी । ऐन कापणीवर असलेल्या एका दोन एकर उसाच्या शेताला काही टवाळखोर तरुणांनी आग लावली. यात शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. १८ मार्च रोजी दुपारी ११ वाजता तालुक्यातील विदगाव शिवारात ही घटना घडली. दरम्यान, याच शेतकऱ्याच्या शेतातील गहु देखील गेल्यावर्षी दोन वेळा टवाळखोरांनी जाळला होता.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सतिष पुंडलिक ढाके (वय ५०, रा. कोळीवाडा, विदगाव, ता. जळगाव) यांच्या शेतात ही आग लावली आहे. ढाके यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदगाव शिवारातील त्यांनी शेतात यंदा तीन एकर क्षेत्रात उस पिकवला होता. दरम्यान, दुचाकीवरुन आलेल्या तीन अनोळखी टवाळखोरांनी खोडसाळपणा करुन ढाके यांच्या शेतातील उसाला आग लावली. हा प्रकार उघडकीस येताच ढाके यांच्यासह कुटुंबिय, मजुर व पररिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रातील उस व पीव्हीसी पाईप जळुन खाक झाले. तर उर्वरीत एक एकर वाचवण्यात ढाके यांना यश आले. दरम्यान, या प्रकरणी ढाके यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. विलास शिंदे तपास करीत आहेत.


