वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची मोदींना चिंता

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली

 

राज्यांना कोरोनाशी लढण्याचा कानमंत्रही मोदींनी दिला आहे. काही राज्यांमध्ये  कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले, आधी तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की, ज्या राज्यांमधून  दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, तिथली परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. मात्र, महाराष्ट्र आणि केरळमध्ये  रुग्णांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे.

 

देशातले ८० टक्केबाधित  याच सहा राज्यांमधले आहेत. ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचंही ते म्हणाले.

 

ते पुढे म्हणाले, ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्या राज्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करुन  तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. कारण जसंजशी रुग्णवाढ होते, तसतसा हा विषाणू आपली रुपे बदलत आहे. अधिक धोकादायक होत आहे.

 

तिसरी लाट रोखण्यासाठी  आत्ताही आपल्याला. टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस…याच रणनीतीच्या आधारावर पुढे जायचं आहे. ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवं  मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवं. त्याचबरोबर संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर  अस्त्र म्हणून करायचा आहे.

 

Protected Content