लोकांच्या मनातील पोलिसांची नकारात्मक प्रतिमा बदलणं हे मोठं आव्हान — मोदी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला त्यांनी सांगितले की, लोकांची पोलिसांबद्दल असलेली नकारात्मक धारणा हे एक मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी प्रशिक्षणार्थींनी काम करणे आवश्यक आहे.

 

सररदार वल्लभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमधील आयपीएस प्रशिक्षणार्थींशी ऑनलाईन संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले, , “आमचे पोलीस कर्मचारी देशाच्या सुरक्षेसाठी, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवादाशी लढण्यासाठी आपले प्राणही अर्पण करतात. ते कित्येक दिवस घरी जाऊ शकत नाहीत, सणांच्या वेळीही ते घरी जाऊ शकत नाहीत परंतु जेव्हा पोलिसांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा लोकांची धारणा वेगळी असते.”

 

 

“सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलची नकारात्मक धारणा हे एक मोठे आव्हान आहे. कोविडच्या सुरुवातीला, ही धारणा थोडी बदलली होती कारण पोलीस गरीब आणि गरजूंना मदत करत होते. तथापि, धारणा पुन्हा नकारात्मक झाली आहे. ” असं म्हणत, पोलीस दलात येणाऱ्या नव्या पिढीची ही प्रतिमा बदलण्याची जबाबदारी असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले.

 

पंतप्रधान मोदी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना पुढे म्हणाले की, राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम हे तुमच्या प्रत्येक कृतीतून नेहमी प्रतिबिंबत व्हायला हवं. कामगिरीवर असताना राष्ट्रहीत कायम डोक्यात ठेवूनच निर्णय घ्यायला हवेत. तुम्ही हे कायम लक्षात ठेवायला हवं की तुम्ही एक भारत, श्रेष्ठ भारताचे ध्वजवाहक आहात.

 

Protected Content