लस निर्मिती एक प्रक्रिया आहे , एका रात्रीत उत्पादन वाढवणं शक्य नाही — अदर पुनावला

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । लस निर्मिती एक प्रक्रिया असून एका रात्रीत उत्पादन वाढवणं शक्य नाही. हे आपल्याला समजलं पाहीजे., अशी भूमिका मांडणारे पत्रक आज सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी प्रसिद्ध केले आहे

 

 

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावला यांनी पत्रक काढून आपली बाजू मांडली आहे. सरकारने ऑर्डर दिली नसल्याने निर्मिती मंदावल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसात येत होत्या. मात्र या बातम्याचं खंडन करत त्यांनी आपली बाजू पत्रकाद्वारे मांडली आहे. आम्हाला सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

 

‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला. त्यामुळे स्पष्टीकरण देत आहे.  भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. सर्वांसाठी पुरेसे ड़ोस तयार करणं सोपं नाही. अगदी विकसित देशातील कंपन्याही संघर्ष करत आहे’, असं अदर पूनावाला यांनी ट्विटरवर टाकलेल्या पत्रात म्हटलं आहे.

 

 

‘गेल्या एप्रिल महिन्यापासून आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. आम्हाला सरकारकडून सर्वोतोपरी मदत मिळत आहे. शास्त्रज्ञ, नियोजन आणि आर्थिक पातळीवर सहकार्य मिळत आहे’, असंही त्यांनी पत्रात पुढे नमुद केलं आहे.

 

‘आतापर्यंत आम्हाला २६ कोटींहून अधिक डोससाठी ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यापैकी १५ कोटीहून अधिक डोस आम्ही पुरविले आहेत. तर पुढच्या ११ कोटी डोससाठी आम्हाला १०० टक्के आगाऊ रक्कमदेखील मिळाली आहे. त्यामुळे लवकरच राज्य आणि खासगी रुग्णालयांना डोस पुरविले जातील. आम्हाला माहिती आहे प्रत्येकाला लस मिळावी असं वाटत आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. आम्ही ती मागणी पूर्ण करू आणि कोरोनाविरुद्धचा लढा लढू’, असं त्यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.

 

अदर पुनावाला यांनी नुकतंच एका मुलाखतीत धमकवणारे फोन येत असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती.

Protected Content