रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार तात्काळ करा ; एनएसयूआयची कुलगुरूंकडे मागणी

 

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा यांच्या वतीने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यामधील रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या लॉक डाउन मधील पगार तात्काळ करण्यात यावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्या कडे दूरध्वनीवरून झालेल्या संभाषनाद्वारे केली.

जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कळविल्यानुसार, मागील चार वर्षापासून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आर्थिक गैरकारभार संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला माहिती आहे. आपल्या सोयीप्रमाणे आर्थिक गैरव्यवहार करण्यासाठी विद्यापीठाने आपल्या मर्जीचे आर्थिक नियोजन अधिकारी सुद्धा विद्यापीठात भरलेले आहेत व प्रामाणिक अधिकाऱ्यांची पायमल्ली करून त्यांना पदावरून हटवले आहे. आता विद्यापीठ थेट रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरती उठलेले दिसून येत आहे. गेल्या मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लोक डाऊन मुळे सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले दिसून आले आहे. परंतु, तरीही लॉकडाउन मध्येही ही आपल्या कार्यावर हजर राहणारे विद्यापीठांमधील सफाई कामगार रोजंदारीवरील व तसेच कंत्राटी कर्मचारी या सर्वांचे विद्यापीठाने जून महिना अर्धा संपत आला असून देखील या सर्व कर्मचाऱ्यांचे फक्त एप्रिल महिन्याचे अर्ध वेतन केले असून संपूर्ण मे महिन्याचा पगार अजूनही बाकी ठेवलेला आहे.

कुलगुरूंनी दिली उडवाउडवीची उत्तरे
जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कुलगुरूंना जाब विचारला असता कुलगुरूंनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत या रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ठेकेदाराला जबाबदार धरले. परंतु जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी ठेकेदाराला विचारले असता ठेकेदाराने या सर्व कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे महिन्याचे संपूर्ण पगाराचे बिल विद्यापीठामध्ये जमा केले आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींवरून स्पष्ट दिसत आहे की विद्यापीठ हेतुपुरस्कर रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबवत आहे. घटना बाह्य नियुक्ती झालेले राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांना विद्यापीठामार्फत विद्यापीठांमध्ये दररोज येण्या जाण्या करता लागणारा प्रवासभत्ता हा मात्र दररोज विद्यापीठाकडून त्यांना दिला जातो. मात्र आपल्या हक्काचे व केलेल्या कामाचे पैसे विद्यापीठ रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या एप्रिल महिन्यापासून देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यापीठाने हा आर्थिक भोंगळ कारभार तात्काळ बंद करावा व रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उरलेले पगार तात्काळ करण्यात यावे अन्यथा जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने या अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन केले जाईल असा इशारा देवेंद्र मराठे यांनी दिला आहे.

Protected Content