रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे

 

मुंबई,  वृत्तसंस्था । राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली कोरोनाचे संकट मोठे असून या संकटकाळात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिक शासनासोबत असल्याचे समाधान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आजही कोविडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे.

रुग्णांमध्ये पोस्ट कोविड लक्षणे दिसून येत आहेत. या स्थितीतही आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावले टाकायला सुरुवात केली आहेत. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते ते आपण एकेक सुरू करत आहोत. व्यवहार बंद ठेवणे हा आवडीचा विषय असूच शकत नाही. कर रूपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. सर्व आर्थिक अडचणींची शासनास जाणीव आहे म्हणूनच मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी नमूद केले.

राज्य शासनाने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकासाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे. कोविडमुळे कोरोना योद्धे बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेऊन सुरू करत आहोत.

कोरोनासोबत जगताना आता प्रत्येकाला जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टींची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे. रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य विषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, सतत हात धुणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसीपीच आहे असे समजा. आपले नाते विश्वासाचे आहे आणि महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेऊन कोरोना विरुद्ध लढाईत सहभागी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला सर्व रेस्टॉरंट व्यावसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलीप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के. भाटिया उपस्थित होते.

Protected Content