रेल्वेच्या धक्क्याने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बकऱ्या चारतांना धावत्या रेल्वेचा जोरदार फटका बसल्याने जखमी झालेल्या ४० वर्षीय महिलेचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी ५ मार्च रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. इंदूबाई युवराज मोरे (वय-४०) रा. केकत निंभोरा ता. रावेर असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदूबाई मोरे ही आपल्या परिवारासह रावेर तालुक्यातील केकत निंभोरा येथे वास्तव्याला होत्या. बकऱ्या चारून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होत्या. नेहमीप्रमाणे इंदूबाई मोरे ह्या शनिवारी ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता केकत निंभोरा शिवारात रेल्वे रूळाच्या परिसरात गेल्या होत्या. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रेल्वेरूळाजवळ बकऱ्या चारत असतांना त्यांना धावत्‍या रेल्वेचा फटका बसला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content