राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेचे काय ?

मुंबई : वृत्तसंस्था । “ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याला राष्ट्रपती बनवलं आहे, त्यांना १९४९ मध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान करणार नाही असं तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांना लिहून द्यावं लागलं होतं,” असं म्हणत ऍड प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपतींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लावले आहे.

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाला होता. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावला होता. या घटनेवरून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणातून नाराजी व्यक्त केली. प्रजासत्ताक दिन आणि तिरंग्याच्या अपमानाची घटना दुर्दैवी असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं होतं. त्यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रपतींना सवाल केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून राष्ट्रपतींना इतिहासाचा दाखल देत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरदार वल्लभभाई पटेल यांना दिलेल्या पत्राचा उल्लेख केला आहे. “आदरणीय राष्ट्रपती महोदय, प्रचंड दुःख आणि खेदाने आपल्याला याची आठवण करून देणं आवश्यक आहे की, ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्याला राष्ट्रपती बनवलं आहे, त्यांना १९४९ मध्ये सरदार पटेल यांना लिहून द्यावं लागलं होतं की, ते तिरंग्याचा अपमान करणार नाही आणि २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला कार्यालयात तिरंगा ध्वज फडकवू.”

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तिरंगा ध्वज तर फडकावला, पण स्वतःचा ध्वजही समान उंचीवर फडकावून आपली नियत दाखवून दिली होती. आपण ही गोष्ट विसरून गेला आहात का? आंदोलक शेतकऱ्यांनी तिरंगा खाली उतरवला नाही. तर तिरंग्याच्या उंचीपासून १५ फूट खाली शीख धर्माचा आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला, यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटतो आहे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी हा काळा दिवस साजरा केला होता. त्यांची निंदा, निषेध का करत नाही करत?,” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढे केलेल्या भाषणात नव्या कृषी कायद्यांचे समर्थन करताना, या कायद्यांमुळे लहान शेतकऱ्यांना लाभ मिळून लागल्याचे म्हटलं होतं. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचाराचा आणि राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा ‘अतिशय दुर्देवी’ अशा शब्दांत त्यांनी निषेध केला होता. जर संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असेल तर त्याचा वापर कायदा आणि नियम पाळून गांभीर्याने करणे अपेक्षित आहे, असंही ते म्हणाले होते.

Protected Content