राळेगावमध्ये शेतात वीज पडून सहा जण ठार !

यवतमाळ (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील गुजरी येथे रविवारी सायंकाळी शेतात वीज पडून सहाजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सर्व मृत कळंब तालुक्यातील निमगव्हाण, खोरपारखिंडी या गावातील रहिवासी आहेत.

 

राळेगाव येथील अरुण गोंडे यांच्या गुजरी शिवारातील शेतात अभिमान विश्वनाथ अंबाडरे (५०), मंदा अभिमान अंबाडरे (४८), लक्ष्मण बापूराव कोहळे (३५), सुभाष रामू नेहारे (२०), साहेबराव गुलाबराव देवनरे (३५) आणि पिसाबाई साहेबराव देवनरे (३०) हे सर्वजण महिनाभरापासून जनावरे चराईसाठी घेऊन आले होते. या सर्वांचे वास्तव्य शेतातच एका पत्र्याच्या शेडमध्ये होते. रविवारी सायंकाळी परिसरात वादळी पाऊस सुरु झाला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पत्र्याच्या शेडवर वीज कोसळल्याने या सहाजणांचा मृत्यू झाला. शेतमालक अरूण गोंडे हे आज (सोमवारी) सकाळी शेतात गेल्यानंतर ही घटना समोर आली.

Protected Content