राज्य सरकारकडूनच जाणीवपूर्वक लसीकरण बंद — फडणवीस

 

मुंबई : वृत्तसंस्था । महाराष्ट्राला १.०६कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने ६ एप्रिल रोजी केले ९१ लाख लसी वापरल्या. १५ लाख लस शिल्लक आहेत. मग, जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी  राज्य   सरकारला विचारला आहे.

 

 

राज्यातील लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सकारवर आरोप केल्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  त्यावर राज्यील लसीकरणाची सद्यस्थितीबाबत माहिती देत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारवर काही गंभीर आरोप देखील केले. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाविकासआघाडी सरकारवर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.

 

 

फडणवीस म्हणाले, “केवळ तीन राज्यांनाच १ कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार) लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरणातील कामगिरीच्या आधारावर! तर, आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लसी पुरवठ्याच्या मार्गात आहेत, तो पुरवठा ९ ते १२ एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिकच्या १९ लाख लस मिळणार आहेत.”

 

“उत्तर प्रदेश हे सर्वांत मोठे राज्य आहे. त्यांना ९२ लाख लसींचे डोस मिळाले आहेत. त्यांनी ८३ लाख डोस वापरले आहेत आणि ९ लाख लसींच्या मात्रा त्यांच्याकडे शिल्लक आहेत. हरयाणाला पहिल्या पाईपलाईनमध्ये फारसे डोस मिळाले नव्हते. त्यांना आता डोस प्राप्त होत आहेत. शरद पवार यांनी डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अवगत करत आश्वस्त केले. मी स्वत:ही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोललो. त्यांनी आश्वस्त केले, महाराष्ट्राशी भेदभाव होणार नाही आणि कामगिरीच्या आधारावर तत्काळ पुरवठा होईल.”

 

कोरोनाविरोधातील लढाईत पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने सर्व राज्यांना सोबत घेऊन ही लढाई लढली आहे आणि महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली आहे. आजही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून सर्व ती मदत करते आहे. व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड उपलब्ध नाही! मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. लस येत आहेत, येत राहतील. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का?” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

 

 

“राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनवर राजकारण कृपया करू नये, ही कळकळीची विनंती आहे.” असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे

Protected Content