राज्यात कृषी कायदे लागू होणार नाहीत

 

तिरुवंतपुरम, वृत्तसंस्था । केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायदे राज्यात लागू न करण्याचा ठराव केरळ विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे या ठरावाला भाजपच्या सदस्याने देखील पाठिंबा दिला आहे.

केरळ विधानसभेने केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे राज्यात लागू न करण्यासंदर्भातील ठराव मंजूर केला. विशेष म्हणजे केरळच्या विधानसभेमध्ये या ठरावाला सर्वांनीच पाठींबा दिल्याने तो एकमताने संमत करण्यात आला. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंटबरोबरच भाजपाच्या एकुलत्या एक सदस्यानेही या ठरावाला पाठिंबा दिला. केरळ विधानसभेमधील भाजपाचे एकमेव आमदार असणाऱ्या ओ राजगोपाल यांनी या ठरावाला चर्चेदरम्यान विरोध दर्शवला. मात्र मतदानाच्या वेळीस राजगोपाल यांनी विरोध केला आहे. राजगोपाल यांनी नंतर आपला सरकारच्या ठरावाला पाठिंबा असल्याने आपण मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून विरोधात मत केलं नाही असं सांगितलं.

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी हा ठराव सभागृहामध्ये मांडला. यामध्ये त्यांनी या कायद्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज असल्याचे म्हटले. कॉर्पोरेट कंपन्यांशी व्यवहार करण्यासंदर्भात शेतकऱ्यांकडे असणारी अधिकार या कायद्यांमुळे कमी होतील, असं या ठरावामध्ये म्हटलं आहे. या काद्यांमध्ये शेतकऱ्याच्या सुरक्षेचा विचार करण्यात आलेल्या नाही. एखाद्या वेळी जेव्हा सरकार खरेदीपासून मागे हटते तेव्हा अन्नसुरक्षेला बाधा निर्माण होते आणि साठवणूक करणे तसेच काळाबाजार वाढतो, असंही या ठरावात नमूद केलं आहे.

Protected Content