राज्यसभेत कृषिमंत्र्यांचा काँग्रेसवर शेतकऱ्यांना भडकावत असल्याचा आरोप

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राज्यसभेत आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषी कायद्याच्या मुद्यावरून सर्वच विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तोमर यांनी काँग्रेसवर आरोप केला की, शेतकऱ्यांना भडकवलं गेलं आहे,

कृषिमंत्री म्हणाले की , उद्योजक तुमची जमीन घेऊन टाकतील. असे शेतकऱ्यांना सांगितले जाते आहे शेतकऱ्यांना मोठा गैरसमज झालेला आहे. त्यांना भरकटवलं जात आहे. संपूर्ण जगाला माहिती आहे पाण्यानेच शेती होते, रक्ताने शेती केवळ काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही. असं म्हणत तोमर यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

राज्यसभेत शेतकरी आंदोलनाबाबत उत्तर देताना कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, ”देशात सध्या उलटी गंगा वाहत आहे. शेतकरी संघटनांना दोन महिन्यांपर्यंत विचारण्यात आले की कायद्यात काय चूक आहे? मात्र शेतकरी नेते हे सांगू शकले नाहीत, की कायद्यात काय कमतरता आहे. शेतकरी संघटना केवळ कायदा रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेल आहेत. आम्ही कर माफ केला तर आता राज्य सरकार कर आकारत आहे. जे कर आकारत आहेत, त्याच्या विरोधात आंदोलन व्हायला हवं. कायद्यात काय कमतरता आहेत, हे शेतकरी नेत्यांनी सांगावं”

यावेळी पंजाबचा उल्लेख करत तोमर म्हणाले, ”भारत सरकार कायद्यात कोणत्याही बदलासाठी तयार आहे, याचा अर्थ असा लावला जाऊ नये की कृषी कायद्यात काही चूक आहे. संपूर्ण एका राज्यात लोकं गैरसमजाचे बळी ठरले आहेत. हा एकाच राज्याचा मुद्दा आहे. आम्ही वारंवार सांगितलं आहे की एपीएमसी संपुष्टात येणार नाही. मात्र शेतकऱ्यांना भरकटवल्या जात आहे.”

Protected Content