रश्मी शुक्लांच्या मदतीला प्रवीण दरेकर धावले

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । फोन टॅपिंग प्रकरणात  राज्य सरकार चौकशीची भाषा करुन रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव निर्माण करु पाहत आहे, असा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला.

 

सरकार चौकशीची इतकी घाई का करत आहे? सरकारने प्रथम पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ती समोर येईल, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

 

यावेळी प्रवीण दरेकर यांनी रश्मी शुक्ला यांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली. रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना धमकावल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, मला आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन वाटते. कुठलाही आमदार नेता अशाप्रकारे दबावाला बळी पडत नसतो. एवढा कमकुवत लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

 

फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी न करताच निष्कर्ष काढणे चूक असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. रश्मी शुक्ला यांनी कोणती नियमबाह्य गोष्ट केलेली नसावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातली तक्रार देवेंद्र फडणवीसांनी केलेलीच आहे. या चौकशीला तुमचा पाठिंबा असेल चौकशी होऊ द्यावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ते समोर येईल ना, मग आम्ही मान्य करू. पण चौकशी करायच्या अगोदरच निष्कर्षाप्रत येणार असाल तर अत्यंत घाईचं आणि चुकीचं ठरेल, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

 

जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी ट्विट करुन हा आरोप केला. शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी महाविकास आघाडीमध्ये न जाता भाजपा बरोबर राहावे, यासाठी रश्मी शुक्ला यांनी त्यांची वैयक्तिक भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांनी त्यांना फोन केले व त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता. रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणखी काय पुरावे हवे आहेत, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content