यावल आदिवासी प्रकल्पात निधीचा अपहार : उपोषणाचा दुसरा दिवस

यावल प्रतिनिधी । येथील आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प जिल्हा कार्यालयातील भ्रष्टाचाराविरूद्ध कारवाई व्हावी व तात्काळ या भ्रष्टाचारातील सहभागी यांच्यावर कारवाई  व्हावी यासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. 

या संदर्भात वृत्त असे की कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहातील पाणी पुरवठा व देयकांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि पाणी पुरवठादारांनी संगनमताने आदिवासीच्या निधीचा अपहार केला आहे.  याची चौकशी करून आदिवासींना न्याय मिळावा यासाठी आदीवासी एकता विद्यार्थी परिषदेच्या वतीने यावल येथील आदिवासी विकास एकात्मीक प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील शासकीय आदिवासी वसतीगृहात सन २०१६ ते जानेवारी २०२०  पर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतू, पाणी पुरवठ्याच्या बिलांमध्ये खाडखोड केले असून बिलांवर शिक्का व स्वाक्षऱ्या केलेल्या नाहीत. तसेच बिलांवर आणि बिल बुकावर नंबर हाताने टाकलेले आहेत. तसेच चार देयकांची रक्कम ही कर्मचारी गृहपाल डी. बी. पाटील यांचे नावे तर कधी कर्मचारी म्हणून तर कधी देयकात विद्यार्थी म्हणून धनादेशाद्वारे जमा केलेली दिसते. एकलव्य महिला आदिवासी स्वयंसहाय्यता बचत गटात चिंचोली यांना सन २०१८-१९ या वर्षांत टँकरने पाणी पुरवठा करण्यास मंजूरी दिलेली आहे. परंतू, संबंधित पाणी पुरवठ्याबाबतचे प्रमाणपत्र आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी तपासणी अहवालही घेतलेला नाही. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरचा नंबरही नाही. याप्रमाणे निधीचा अपहार केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. परंतु, अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आली नसल्याने आज आदिवासी एकता विद्यार्थी परिषदेच्या वतीने यावल आदिवासी  विकास एकात्मीक प्रकल्प कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल गायकवाड, जिल्हाध्यक्ष करण हरदास सोनवणे, जिल्हा सचिव यशवंत अहिरे, तंट्या भिल ब्रिगेडचे महेंद्र मोरे, कृष्णा मोरे यांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. दरम्यान, आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून, काल रात्री उशीरापर्यंत आदिवासी एकात्मीक विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी उपोषण स्थळाला भेट देवून  त्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली. मात्र याबाबत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सांगण्यात आले. कारवाईचे  ठोस असे लिखित आश्वासन मिळाल्या शिवाय आमरण उपोषणाची सांगता होणार नाही असे उपोषणकर्ते यांनी भूमिका घेतली आहे. भ्रष्ट  प्रशासनाच्या विरूद्धच्या लढात आदिवासी तडवी भिल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी यांनी पाठींबा दर्शिविला आहे.

Protected Content