मुंबईत शिथिलता येताच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूकीची कोंडी

मुंबई वृत्तसंस्था । तिसऱ्या टप्प्यात अधिक शिथिलता येताच मुंबईकर अक्षरशः सुटले आहेत. राज्य सरकारच्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत आजपासून काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी ‘बेस्ट’ बससाठी गर्दी पाहायला मिळाली, तर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली.

खासगी कार्यालये 10 टक्के कर्मचाऱ्यांसह सुरु करण्याला तिसऱ्या टप्प्यात परवानगी मिळाली आहे. मुंबई अनलॉक होताच पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर उतरली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसल्या. कांदिवली-गोरेगाव भागात पुन्हा पूर्वीप्रमाणे सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाली. अनेक गाड्या एकाच जागेवर बराच वेळ खोळंबून राहिल्या.

ठाण्यातील आनंदनगर मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. लोकल सेवा बंद असल्याने चाकरमानी कामावर जाण्यासाठी बेस्ट किंवा स्वतःची चारचाकी आणि दुचाकींचा वापर करत आहे. त्यामुळे साहजिकच काही प्रमाणात गाड्या टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या आहेत. ई पास सेवा बंद केल्यामुळे जड अवजड वाहनेही रस्त्यावर येत आहेत.

Protected Content