
जयपूर (वृत्तसंस्था) ते भाजपाच्या पाठिंब्याने मागील सहा महिन्यांपासून कट रचत होते. सरकार पाडण्यासाठी कट शिजत असल्याचे जेव्हा मी सांगत होतो, तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. कुणाालाही माहिती नव्हते की इतका निष्पाप चेहरा असलेली व्यक्ती असे करेल. मी इथे भाजीपाला विकायला नाहीये. मी मुख्यमंत्री आहे, अशा शब्दात गेहलोत यांनी सचिन पायलट यांच्याविरुद्ध आपला संताप व्यक्त केला आहे.

सचिन पायलट आणि बंडखोरांमुळे राजस्थानातील कॉंग्रेसचे सरकार संकटात सापडले आहे. या सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान आहे. गेल्या पाच सहा दिवसापासून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगले तापले आहे. कॉंग्रेसची मोठी फौजच गेहलोत सरकार कोणत्याही परिस्थितीत वाचविण्यासाठी पुढे आली आहे. तर दुसरीकडे पायलटांनी बंड केल्याने गेहलोत कमालीचे संतप्त झाले आहे. सध्या काँग्रेसचे आमदार हॉटेलमध्ये असून, सचिन पायलट यांच्याविषयी माध्यमांशी बोलताना अशोक गेहलोत भडकले आहेत. सचिन पायलट भाजपाच्या पाठिंब्याने मागील सहा महिन्यांपासून कट रचत होते. मी इथे भाजीपाला विकायला नाहीये. मी मुख्यमंत्री आहे, अशा शब्दात गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, सचिन पायलट यांनी आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी नोटीस मिळाल्यानंतर बंड पुकारले आहे. त्यानंतर काँग्रेसचे सरकार वाचवण्यासाठी अशोक गेहलोत प्रयत्न करताना दिसत आहे.


