माळपिंप्री शिवारात शेतकऱ्याला बेदम मारहाण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील माळपिंप्री शिवारात शेताला पाणी देण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला ६ जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून डोक्याला गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवार १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता जामनेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ईश्वर राजाराम गायकवाड (वय-४९) रा. माळपिंप्री ता. जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उतरनिर्वाह करतात त्यांचे माळपिंप्री शिवारात शेत आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शेताला पाणी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून गावात राहणारे नाना चंदू पवार, गणेश चंदू पवार, भूषण अनिल पवार, गणेश अनिल पवार, गजानन भागवत पवार आणि भागवत चंदू पवार यांनी शेतात येऊन ईश्वर गायकवाड याला अश्लील शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी काठीने त्याच्या डोक्याला मारहाण करून गंभीर दुखापत केली. या मारहाणीमध्ये ईश्वर गायकवाड हा गंभीर जखमी झाला असून त्याला जामनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक अतुल पवार करीत आहे.

Protected Content