मान्सून तीन दिवसांत माघार घेणार

मुंबई : वृत्तसंस्था । मान्सून येत्या तीन दिवसांतमाघार घेणार आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण भारतीय द्वीपकल्पात पाऊस संपलेला असेल. सध्या अनेक भागात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती दिसत असली तरी चार दिवसांनंतर देशभरात कोरडी स्थिती असेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या २४ तासांत झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर आणि मध्य अरबी समुद्र, ओडिशा आणि उत्तर महाराष्ट्रात मान्सूनच्या माघारीसाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती येत्या दोन दिवसांत पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगाणा, ईशान्येकडील राज्यांत, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील बहुतेक भागात तयार होईल.

बंगालचा उपसागर आणि दक्षिण द्वीपकल्पातील जमीनीवरुन ईशान्येकडून वारे वाहू लागल्याने नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून २८ ऑक्टोबरच्या सुमारास संपूर्ण देशातून मागे हटण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या परतीची तारीख साधारणत: १५ ऑक्टोबर असते. मात्र, यंदा मान्सूनला माघार घ्यायला जवळपास पंधरवाड्याचा उशीर झाला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता ईशान्येकडे सरकत आहे. सध्या तो बांगलादेशच्या मध्यावर पोहोचला आहे. याचा परिणाम म्हणून दक्षिण आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये साधारण ते मुसळधार पावसाची शक्यता आहे

Protected Content