मानराज पार्कजवळ कारचा अपघात; सुदैवाने दोघे बचावले

जळगाव प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्कजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सुरतकडे जात असलेल्या कारच्या उजव्या बाजूचा नटबोल्ट निघून चाक निघण्यापूर्वी कारवर नियंत्रण मिळविल्याने या कारअपघातात सुदैवाने कारमधील दोघेही मित्र बचावले आहे.

दरम्यान जळगाव येण्यापूर्वीही यवतमाळ जिल्ह्यात या कारचा कार पलटून अपघात झाला होता. यात कारचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. दोन अपघात होवूनही दैव बलवत्तर कारमधील दोघा मित्रांना कुठलीही इजा झाली नाही.

गुजरात राज्यातील सुरत येथील भरतभाई अंबाबाई सुकरिया हे त्यांचा मित्र हर्षदभाई गाभानी यांच्यासोबत कारने (क्र. जी.जे.05 सीडी 4355) यवतमाळ जिल्ह्यात कंपनीच्या कामासाठी गेले होते. त्याठिकाणाहून काम आटोपून दोघेही बुधवारी सुरतकडे निघाले. यादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील धोरेफेल गावाजवळ कार खड्डयात जावून रस्त्याच्या बाजूला उलटली. यात कारच्या पुढच्या तसेच मागच्या बाजूच्या काचा फुटून तसेच इतर नुकसान झाले. यानंतर आहे त्या स्थितीत कार घेवून ते पुन्हा सुरतकडे निघाले. शुक्रवारी 13 नोव्हेंबर रोजी ते जळगावात पोहचले, जळगाव शहरातून जात असतांना शुक्रवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्कजवळ त्याच्या कारच्या उजव्या बाजूच्या चाकाजवळील नटबोल्ट निघाला. कारचे चाक निघळून बाहेर पडणार तोच सुकरिया यांनी नियंत्रण मिळवून कार दुभाजकाच्या बाजूला थांबविली. कार वेगात असती, तर मोठी दुर्घटना घडली असती, मात्र कारचा वेग कमी असल्याने कारवर नियंत्रण मिळविता आले, असे सुकरिया यांनी बोलतांना सांगितले. याठिकाणी काम पूर्ण करुन ते सुरतकडे रवाना होणार आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळ पाहणी करुन अपघाताची माहिती जाणून घेतले.

Protected Content